Breaking News
नवी मुंबई ः शासन परिपत्रकान्वये बेवारस वाहनांवर कारवाई करणे आवश्यक आहे. पालिका क्षेत्रातील बर्याच रस्त्यावर बंद बेवारस वाहनांमुळे अडथळा निर्माण होत आहे. पालिकेने वारंवार आवाहन करुनही ही वाहने तशीच पडून आहेत. या वाहनांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याआधी ही वाहने संबंधित मालकांनी हटविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये रस्त्यावरील तसेच पुलाखालील एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांची संख्या वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साफसफाईद व बेच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. शहरातील सर्वच क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात बंद बेवारस वाहने ठिकठिकाणी मुख्य रहदारीचे रस्ते व त्याअंतर्गत रस्ते यावर असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठया प्रमाणात कचरा असल्यामुळे तो नियमित साफसफाई करता येत नाही. याबाबत महानगरपालिकेने नियमितपणे वाहने हटविणेबाबत नागरिकांना जाहीर आवाहन केलेले होते. मात्र, अदयापही नागरिकांनी बंद बेवारस अवस्थेत असलेली वाहने हटविलेली नाहीत. पालिकेच्या वतीने मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर बंद बेवारस अवस्थेत उभ्या असलेल्या वाहनांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1945, मधील कलम 230 व 231 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. ही वाहने महापालिकेच्या क्षेपणभूमी येथे जमा करण्यात येणार आहेत. ज्या मालकांची वाहने महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत यापूर्वी उचलण्यात आली असतील, अशा वाहनांच्या मालकांनी त्या त्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावयाचा आहे. तरी पालिका क्षेत्रात रस्त्यावर,पुलाखालील जागेत बंद, बेवारस स्थितीत असलेली वाहने तात्काळ हटवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai