Breaking News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले महाराष्ट्रवासियांचे कौतुक
मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेऊन आपापल्या राज्यातली स्थिती सांगितली. यावेळी पंतप्रधानांनी ‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है’ असं कौतुक केले. तसेच कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.
पंतप्रधान म्हणाले, देशात 700 जिल्हे आहेत आणि त्यात 7 राज्यांमधल्या फक्त 60 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातले 20 जिल्हे आहेत ही चिंतेची बाब आहे. या जिल्ह्यांमधला कोरोनाचा प्रसार कसा आटोक्यात आणता येतील याची काळजी घ्या असला सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणार्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतरदेखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणार्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकार करीत असलेल्या काही महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai