Breaking News
नवी मुंबई ः संपर्कातून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने त्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय व इतर कार्यालयात अभ्यागतांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी जारी केले आहेत.
सध्या संपूर्ण जगभरात विविध देशांत कोरोनो विषाणूची लागण झालेली असून जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूद्वारे प्रसारित रोगास जगभर पसरलेला साथीचा रोग म्हणून घोषित केलेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मंत्रालयामध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना तात्पुरती प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय व इतर कार्यालयात अभ्यागतांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी जारी केले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग गर्दीच्या ठिकाणी होऊ नये याकरिता सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता पुढील सूचना होईपर्यंत महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांचे काही तातडीचे काम असल्यास त्यांनी महानगरपालिकेच्या पब्लिक ग्रिव्हेन्स प्रणालीवर आपली तक्रार, सूचना नोंदवावी तसेच ईमेल वा व्हॉट्स अप संदेशाव्दारे अथवा दूरध्वनी, भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
महानगरपालिका मुख्यालयांतर्गत विभागप्रमुखांनी आगामी कालावधीत होणार्या नियोजित सभा,बैठका आपल्या स्तरावर पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात तसेच, अत्यंत तातडीच्या असतील अशाच बैठका आवश्यकतेनुसार आयोजित कराव्यात व या बैठकांमध्ये खाजगी व्यक्तींना आमंत्रित करु नये असे या आदेशात सूचित करण्यात आले आहे. नागरिकांची पत्रे तसेच मुख्यालयातील दैनंदिन टपाल व इतर महत्वाची पत्रे स्विकारण्यासाठी मुख्यालय इमारतीच्या प्रवेशव्दार क्रमांक 1 याठिकाणी सुरक्षा रक्षक चौकीमध्ये टपाल स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी पत्रव्यवहारासाठी ऑनलाईन प्रणाली वापरावी असे आवाहन करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग व आरोग्य विभाग यांनी समन्वयाने मुख्यालयासह शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये यासह महानगरपालिकेची सर्व कार्यालये निर्जंतुकीकरण करुन स्वच्छ ठेवावीत. तसेच, पुढील कालावधीत वॉश बेसिनच्या ठिकाणी हॅन्ड वॉश / सॅनिटायझर पूर्णवेळ ठेवण्याची दक्षता घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai