Breaking News
वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी न्यायालयात झाले होते हजर ; पुढील सुनावणी 5 मे रोजी
नवी मुंबई : वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 2014 साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज 6 फेब्रुवारी रोजी राज ठाकरे यांना जामीन मिळाला आहे. राज ठाकरे स्वत: वाशी कोर्टात हजर झाले होते. त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.
26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे, नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळेंसह एकूण 7 जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनसेच्या इतर कार्यकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली असली तरी राज ठाकरे यांनी मात्र पोलिसांच्या नोटिसींना उत्तरे दिली नव्हती. याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. त्यानुसार राज ठाकरे कोर्टात हजर राहिले. वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यावेळी मी भाषण केले आहे, मात्र मला गुन्हा मान्य नाही, असे राज ठाकरे यांनी सुनावणीदरम्यान न्यायलयाला सांगितले. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 5 मे रोजी होणार आहे. यानंतर कोर्टाकडून साक्षीदारांना समन्स देण्यात येईल आणि केसला सुरुवात होईल. यापुढे राज ठाकरे यांना सुनावणीसाठी यावं लागणार नाही, असं वकिलांनी सांगितलं आहे. यावेळी राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, गजानन काळे उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai