Breaking News
केजरीवाल यांच्या अटकेचे देशभर पडसाद
मुंबई ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी (21 मार्च) रात्री उशिरा अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अटक केली. त्याचे तीव्र राजकीय, सामाजिक पडसाद देशात उमटू लागले आहेत. देशभरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही खेळी खेळली जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात गेल्याने दिल्लीतील सरकार कसं चालवलं जाईल, हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीची उलटी गणती सुरु असताना हा प्रकार घडल्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना एकूण दहा समन्स बजावले होते, मात्र तरीही ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. अशातच, आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. यावर गुरुवारी सुनावणी झाली. तथापि, केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर काही तासांतच अंमलबजावणी संचनालयाची (ईडी) टीम गुरुवारी (21 मार्च) संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि त्यांना अटक केली. यावेळी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते. ‘आप' कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी केजरीवालांच्या निवासस्थानाच्या परिसरात कलम 144 लागू केला होता.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर सर्वत्र आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. दिल्लीमध्ये अचानक झालेली कारवाई ही म्हणजे तानाशाही असून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai