Breaking News
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा आवारातील धोकादायक इमारतीत खाली करण्यासाठी व्यापाऱ्यांचे स्थलांतर करणे महत्त्वाचे आहे. मात्र यासाठी पर्यायी मोठी जागा मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. मात्र आता कांदा बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी बाजार समिती प्रशासनाने पर्यायी जागा शोधली असून कांदा बटाटा आवारातील लिलाव गृह शेजारी व म्याफको मार्केट मागील मोकळ्या जागेत शेड बांधून गाळे तयार करणार आहे. तसेच बाजारातील विंग प्रमाणे व्यापाऱ्यांना त्याठिकाणी स्थलांतर करण्यात येईल अशी माहिती एपीएमसीतील सुत्रांनी दिली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजारातील सिडको निर्मित इमारती वर्षनुवर्षं धोकादायक जाहीर होत आहेत. सन 2005 पासून कांदा बटाटा बाजार अतिधोकादायक जाहीर होत असून दर वर्षी पावसाळ्यात मे महिन्यात खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात येतात. कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास रखडत असून तसेच येथील व्यापाऱ्यांना पुनर्बांधणी दरम्यान पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने स्थलांतर ही करता येत नव्हते, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. लवकरात लवकर कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे, हे सर्वांच्या लक्षात आले असून त्यासाठी बाजार घटकांनी तयारी दर्शवली आहे. व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी प्रशासनाने पर्यायी जागा पाहिली आहे. बाजार आवारातील लिलाव गृह शेजारी काही तर म्याफको मार्केट मागील मोकळा भुखंड असे दोन ठिकाणी तात्पुरते गाळे उभारले जाणार आहेत. या दोन्ही जागा शेतकरी,ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या सोयीने पहिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या व्यापारी हे पर्यायी जागेत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai