Breaking News
थाळींची संख्या 18 हजारांवरुन 36 हजारांवर
मुंबई : शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. ही संख्या 18 हजारांवरुन 36 हजार थाळी इतकी झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय काल जाहीर केला आहे. यानुसार सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले किमान 75 आणि कमाल 150 थाळींचे उद्दिष्ट मागणीनुसार वाढवून किमान 75 आणि कमाल 200 थाळी इतके वाढवता येईल.
राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु केली होती. पहिल्या दिवसापासूनच योजनेला राज्यातील गोरगरिब जनतेने उदंड प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये बस आणि रेल्वे स्थानके, बाजारपेठा यासारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबविली जात असली तरी भविष्यात योजनेचा आणखी विस्तार करण्याचे नियोजित आहे. 18 फेब्रुवारी रोजी 148 केंद्रावर 16 हजार 237 लोकांनी शिवभोजन योजनेतील थाळीचा अस्वाद घेतल्याचे दिसून आले आहे.
शिवभोजन योजनेला मिळणार्या प्रचंड प्रतिसादामुळे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला योजनेच्या विस्ताराची सूचना दिली होती. त्यानुसार शिवभोजन थाळींच्या संख्येत दुप्पटीने वाढ करून, ही संख्या 18 हजारांवरून 36 हजार इतकी करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्राची निवड पूर्वीच्याच पद्धतीने करण्यात येणार आहे.
शिवभोजन केंद्रांना भेट
अन्न, नागरी पुरवठा विभागातील अधिकार्यांव्यतिरिक्त तहसीलदार, गट विकास अधिकारी तथा समकक्ष अधिकार्यांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट आणि तपासणी आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यावयाचे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai