लोकल, बस बंद नाही पण...

मुंबई : राज्यभर वेगाने पसरणार्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्य शासन कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष होते. अद्याप लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय झालेला नाही.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी माहिती देताना म्हटले की, राज्यात आतापर्यंत 40 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. यामध्ये 28 पुरूष आणि 13 महिलांचा समावेश आहे. करोनाग्रस्तांपैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तसेच लोकांनी कोरोनाचा धोका ओळखून जबाबदारीने वागायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करायची वेळ येता कामा नये. पुण्यातील दुकानदारांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद केली याचे मी स्वागत करतो. राज्याच्या अन्य भागातील दुकानदारांनीही जीवनावश्यक गोष्टी वगळता इतर दुकाने बंद करावीत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
राज्यात कोरोनाचे 41 रुग्ण, एकाची प्रकृती गंभीर, इतरांची प्रकृती स्थिर
बस-ट्रेन बंद करण्याचा निर्णय नाही. सध्या ट्रॅफिक कमी झाले आहे, बस-ट्रेन अत्यावश्यक सेवा असल्याने बंद केलेल्या नाहीत.
अनावश्यक प्रवास टाळा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका
नागरिकांनी शिस्त पाळली तर कठोर पावले उचलण्याची गरज नाही
जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवा
सरकारी कर्मचार्यांना सुट्टी दिलेली नाही. पण 50 टक्के कर्मचार्यांमध्ये काम करण्याचा विचार सुरु आहे.
पुढील 15 दिवसांचा कालखंड महत्त्वाचा
कोरोनाशी लढा देण्याची पूर्ण तयारी आहे. नागरिकांच्या सहकार्याने धोका टळू शकतो.
खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या चाचणीला परवानगी दिलेली नाही.
खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश