Breaking News
नवी दिल्ली : कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात आता डाळींचे दर ही भारतात वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये डाळींच्या भावात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी हरभरा डाळीची किंमत 70-80 रुपये प्रति किलो होती, परंतु यावेळी ती शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे. तूरडाळ 115 रुपये प्रति किलोला विकली जात आहे. पुरवठा वाढविण्यासाठी नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) व्यापार्यांना स्टॉक रिलीज करण्याची मागणी केली आहे. सध्या डाळींचा पुरवठा कमी झाला आहे तर, मागणी सातत्याने वाढत आहे. म्हणून व्यापार्यांनी 2020-21 पर्यंत आयात कोटा देण्याची मागणी केली आहे. मात्र, पुरवठ्याची परिस्थिती चांगली असल्याचे सरकारचे मत आहे आणि पुढील तीन महिन्यांत खरीप हंगामातील पीक बाजारात येण्यास सुरवात होईल.
दरम्यान, अलीकडेच कृषी आयुक्त एस.के. मल्होत्रा यांनी भारतीय डाळी व धान्य असोसिएशनच्या (आयपीजीए) वतीने आयोजित वेबिनारमध्ये सांगितले होते की खरीप हंगामात डाळींचे एकूण उत्पादन 93 लाख टन होईल अशी भारताला अपेक्षा आहे. मागील वर्षी तूरडाळीचे उत्पादन 38.3 लाख टन झाले होते, यावेळी हेच उत्पादन 40 लाख होऊ शकते.
यामुळे वाढत आहेत दर
व्यापार्यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन काळात तूरडाळीचे दर प्रति किलो 90 रुपयांनी वाढले आणि नंतर ते 82 रुपये प्रति किलोवर गेले. आता किंमत पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात डाळींची मागणी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे कर्नाटकातील तूरडाळीचे पिकाचे नुकसान होईल, अशी भीती व्यापार्यांना आहे. यामुळे उत्पन्नामध्ये 10% तोटा होऊ शकतो. 2010-21 साठी कडधान्याच्या आयातदारांनी तूर आयात इम्पोर्ट कोटा जाहीर करावा अशी मागणी केली आहे. एप्रिलमध्ये सरकारने 4 लाख टन तूर आयात कोटा जाहीर केला, जो अद्याप वाटप झालेला नाही. यापैकी 2 लाख टन तूर मोझांबिकहून येणार होती. त्यामुळे देशात डाळींच्या किंमती वाढत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai