Breaking News
2008 साली मुंबईवर दहशदवादी हल्ला होऊन तेरा वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील अनेक त्रुटी उघडकीस आल्या त्याचबरोबर मानवी जीवनातील अनेक पैलूंचे दर्शनही या हल्ल्याच्या वेळी देशातील लोकांनी अनुभवले. या हल्ल्यात जवळजवळ 197 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये 34 परदेशी नागरिकांचा समावेश होता. 17 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला तर 800 लोक जखमी झाले. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे आणि संदीप उन्नीकृष्णन याना वीरगती प्राप्त झाली तर तुकाराम ओंबळे यांनी जीवावर उदार होऊन कसाबला पकडून देताना दाखवलेले असीम शौर्य मातृभूमीच्या रक्षणासाठी कोणत्याही त्यागाची तयार असणार्या भारतीयांच्या शौर्याची ओळख करून देते. परंतु हे सर्व घडून आज तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातून आपण कोणता धडा घेतला हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.
26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. नोव्हेंबर 26 रोजी रात्री 8:10 वाजता एका बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. पैकी सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनार्यालगत पुढे गेले. स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले. 8:20 वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणार्या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे बोलून ते दोन गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. याबाबतची खबर अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने भारताला या अगोदरच दिली होती पण त्याच्याकडेही दुर्लक्ष झाल्याने देशाला एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दहशतवाद्यांनी छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या आठ ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला. या हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव दहशतवादी म्हणजे अजमल कसाब. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले आणि कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला. परंतु 7 जानेवारी 2009 रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईवर हल्ला करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा डाव या सुनियोजित हल्ल्यामागे पाकिस्तानचा होता. 1992 साली जेव्हा मुंबईतील स्टॉक एक्सचेंज मध्ये बॉम्बस्फोट केला गेला तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार यांनी दुसर्याच दिवशी स्टॉक एक्सचेन्ज सुरु करून योग्य संदेश जगाला दिला. ताजवर झालेल्या हल्ल्यातून सावरत रतन टाटा यांनी अल्पावधीत ताज हॉटेल सुरु करून भारतीय दहशदवादी हल्ल्याला भीक घालत नसल्याचे दाखवून दिले. अशी अतिक्रमणे भारतावर गेली हजारो वर्षे होत असतानाही भारत आजही एकसंध उभा आहे तो भारतीयांमध्ये तेवत असलेल्या जाज्वल्य मातृभुमीच्या प्रेमामुळे.
भारतावर 26/11 रोजी झालेला हल्ला काही एकमात्र हल्ला नाही. 1992 साली मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, गोध्रा हत्याकांड त्यानंतर वाजपेयी पंतप्रधान असताना संसदेवर झालेला हल्ला असो किंवा मोंदीच्या काळात पुलवामा आणि उरी येथे सैनिकांवर झालेला हल्ला. पहिल्या व दुसरा हल्ल्यात देशातील नागरिकांना लक्ष करून हिंदू मुस्लिम दंगे घडवण्यात पाकिस्तानचा डाव होता. पण मुसलमान व हिंदूंच्या सामंजस्यामूळे हे मनसुबे यशस्वी झाले नाहीत. दुसरा हल्ला हा वाजपेयी पंतप्रधान असताना संसदेवर करण्यात आला. हा हल्ला जर यशस्वी झाला असता तर मोठा गहजब झाला असता. राज्यकर्तेच जर या हल्ल्याला बळी पडले असते किंवा ओलीस राहिले असते तर ? ही कल्पनाच करवत नाही. त्यावेळी देशात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, पण अमेरिकेच्या मध्यस्थीने त्यावेळी वाजपेयींनी एक पाऊल मागे घेऊन पाकिस्तानला संधी दिली. त्याचे फळ म्हणून वाजपेयींना कारगिल युद्धाला सामोरे जावे लागले. नंतरचे दोनही हल्ले हे देशातील सैनिकांना लक्ष ठेवून करण्यात आले. पण मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर दिले.
370 कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीर मध्ये दहशदवादाने डोके वर काढले आहे. दररोज दहशदवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या बातम्या ऐकतो पण त्याचवेळी देशाचे जवान लढताना बळी पडत असल्याचे पाहून मन विषिन्न होते. व्यर्थ न हो बलिदानाच्या घोषणा अजून किती वेळा द्याव्या लागतील हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे या सर्व धर्मांधते विरुद्ध सर्वांनी एकजुटीने लढणे उचित ठरेल. सध्याचे राजकीय वातावरण पाहता आपला देश हिंदू मुसलमान, भारत-पाकिस्तान या जंजाळात अडकला असून भारतीय समाजातील धर्मांमधील वाढणारी दुरी देशाच्या अखंडतेला घातक आहे याचे भान सर्वच राजकर्त्यांनी ठेवणे उचित ठरेल. 26/11 च्या हल्ल्याची जाणीव मनात तेवत ठेवण्यासाठी आणि हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांसाठी स्मारक बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय उचित असला तर या हल्ल्यातून आपण काय धडा घेतला याची उजळणी प्रत्येक राजकर्त्याने आणि नागरिकाने करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतल्यास शहिदांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे