Breaking News
इतिहासात होऊन गेलेल्या अनेक नेत्यांबद्दल देशात सध्या वाद-विवाद सुरू आहेत. शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या इतिहासाला आणि घडलेल्या घटनांना सध्या विविध राजकीय पक्ष आताच्या परिस्थितीच्या चष्म्यातून पाहात असल्याने हा विवाद निर्माण झाला आहे. काही वाद-विवाद जाणीवपूर्वक तर काही काळाच्या ओघात इतिहासाची चुकीची सांगड घातल्याने निर्माण झाले आहेत. जे लोक किंवा पक्ष नको ती चर्चा प्रसार माध्यमात घडवत आहेत ते पाहून ज्या ऐतिहासिक व्यक्तींमत्त्वांबद्दल ही अनाठायी चर्चा घडवली जात आहे त्यांचा आपण उपमर्द तर करत नाही ना ? याचे भान सर्वानीच हरवल्याचे दुःख आहे. या नेत्यांमध्ये प्रामुख्याने सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या प्रभूतींचा समावेश आहे. ज्या नेत्यांच्या नावाने हा वाद निर्माण केला जात आहे त्यांच्या पायाजवळ उभे राहण्याची तरी पात्रता या नेत्यांची आणि पक्षांची आहे काय? हा विचार सर्वांनीच करण्याची वेळ आली आहे. परंतु इतिहासाची पाने उलटी फिरवायला निघालेल्या या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोण समजावेल हा खरा यक्ष प्रश्न आहे.
आज अनेक पक्षांनी इतिहासात होऊन गेलेल्या नेत्यांना, साधुसंतांना आपापल्यात वाटून घेण्याची अहमिका चालवली आहे. कोणाला बोली भाषेवरून सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी आपले आदर्श वाटतात तर कोणाला पेहरावावरून भगतसिंग आपले वाटतात, कोणाला जातीमुळे बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आपले वाटतात तर कोणाला धर्मावरून मौलाना कलम आझाद आपले वाटतात. परंतु ज्यां पक्षांनी आणि राज्यकर्त्यांनी या महापुरुषांना आपापसात वाटून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे त्याऐवजी त्यांचे गुण घेतले असते तर भारताचा इतिहास, भूगोल वेगळा असता. या महापुरुषांचा जीवन प्रवास, कार्यकाल आणि तपस्या पहिली तर या सर्वांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. अनेक धर्माच्या, पंथांच्या, जातीच्या लोकांनी खांद्याला खांदा लावून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे. हसत हसत फासाचा दोर आपल्या गळ्यात घातला आहे. परंतु या महात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे महत्व आजच्या राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही. त्यांच्याकडे विचारांचा आणि संस्कारांचा वारसा नसल्याने ते या सूर्यासारख्या तेजस्वी स्वातंत्र्यवीरांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या पक्षाच्या दावणीला बांधायला निघाले आहेत. सूर्याला कोणी आपल्या दावणीला बांधू शकतो का याचे भान त्यांना नाही. तसा प्रयत्न करणार्यांचे हात यात नक्कीच पोळतील यात तिळमात्र शंका नाही. कित्येक दशके भारतीयांच्या हृदयात वसलेल्या स्वातंत्र्यवीरांनाचा मानसन्मान वाढवायला हे आताचे सत्तालोभी, भ्रष्ट नेते निघाले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले नेते, त्यांचे चारित्र्य, त्यांचे विचार आणि आता पावलोपावली खोटे बोलणारे, दिवसाला चार वेळा कपडे बदलणारे नेते पाहिले की जाणवते कुठे इंद्राचा ऐरावत तर कुठे भानूभटाची तट्टानी.
अनेक दशके स्वातंत्रवीरांचा यथोचित सन्मान भारतीयांकडून होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षाला संपवण्याच्या नादात त्या पक्षाकडून देशातील अनेक स्वातंत्रवीरांचा कसा अपमान केला गेला हे हेतुपुरस्पर पसरवले जात आहे. हा खेळ फक्त त्या-त्या राज्यातील निवडणुका आल्या की जाणीवपूर्वक खेळला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सरदार पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर पंडित नेहरूंनी कसा अन्याय केला हे सांगून त्या राज्याच्या अस्मितेला हात घातला जात आहे. हे खरंच भयानक आहे. सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. हे दोन्ही नेते जेव्हढे तुल्यबळ होते तेव्हढेच ते एकमेकांचा कमालीचा आदर करीत. आताच्या नेत्यांसारखे एकमेकांचे पत्ते कापणे किंवा ईडी सीबीआयचा खेळ खेळत नसत. नेहरूंनी पटेलांना पंतप्रधान केले नाही हा कमालीचा खोटा प्रचार भाजपकडून करण्यात येतो. खरंतर पटेल यांचा स्वर्गवास 1950 मध्ये झाला आणि भारताची पहिली निवडणूक 1951 मध्ये झाली. त्यामुळे पटेल पंतप्रधान बनण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. परंतु सध्या अंधभक्तांना वॉट्सअँप हि शिक्षणाची नवीन गंगोत्री मिळाली असल्याने दिवसरात्र ते ह्या ज्ञानाच्या गंगेत डुबकी मारत आहेत.
असाच प्रकार नेताजी सुभाषचंद्रांबद्दल भाजपकडून पसरवला जात आहे. नेताजींच्या त्यागाचा यथोचित मान नेहरूंनी राखला नाही अशी तक्रार भाजपची आहे. नेताजी हेच देशाचे पंतप्रधान बनले असते हा नवा जावई शोध ते लावतात. 2014 च्या निवडणुक प्रचारात मोदी नेताजींच्या फायली भारत सरकारने जनतेसाठी खुल्या कराव्यात अशी मागणी करत होते. आमचे सरकार आले तर आम्ही त्या सर्व फायली उघड्या करू म्हणणारे मोदींची आज दातखिळी बसली आहे. आझाद हिंद सेनेचा खटला चालवणारे नेहरूच होते व गांधीजींना महात्मा उपाधी देणारे नेताजीच होते. नेताजी सुभाषचंद्र, नेहरू आणि गांधी यांच्यात वितुष्ट होते हे सांगून समाजात या नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक भ्रम पसरवला जात आहे. हा भ्रम या स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम आहे म्हणून नाही तर त्यांच्यावरील खोट्या अन्यायाची गाथा पसरवली तर काँग्रेस विरोधात जनमत होऊन मते आपल्याला मिळतील एवढाच यामागचा उद्देश. किती निरर्थक आणि भयाण प्रयत्न आहे हा. आपल्या देशाच्या आदर्शांचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी बाजार मांडणार्या नेत्यांचा बाजार उठवण्याची वेळ आली आहे.
सध्या सावरकरांबद्दल असाच वाद उफाळून आला आहे. सावरकरांना भारतरत्न द्या म्हणणारे गेले आठ वर्ष सत्तेत असून गप्प आहेत तर राहुल गांधी त्यांना माफीवीर म्हणून हिणवत आहेत. सावरकरांना भारतरत्न दिले म्हणून सावरकर मोठे होणार नाहीत किंवा त्यांना माफीवीर संबोधले म्हणून ते लहान होणार नाहीत. निव्वळ सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे हा. सावरकरांचा यथोचित सन्मान तत्कालीन भारत सरकारने केला असून त्यांच्या त्यागाचा मान ठेवून 1971 साली तिकीट काढले होते. इंदिरा गांधी यांनी स्वतः सावरकरांच्या त्यागाची यशोगाथा गायली आहे. असे असताना राहुल गांधी सावरकरांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह उभे करत असतील तर ते निश्चितच निषेधार्य आहे. भाजपाला हा विषय तेवत ठेवून यातून मतांचे राजकारण खेळायचे आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळात राहुल गांधी किंवा त्यांचे साथीदार अनावश्यक टिप्पणी करून कार्यकर्त्यांची मेहनत मातीमोल करतात. प्रत्येक व्यक्तिमत्वाकडून चुका होत असतात पण त्याचा स्वीकार करण्याची ताकद फक्त एखाद्या गांधींमध्येच असते. आपण अनेक दशकांपूर्वी घेतलेल्या निर्णयांचा अन्वयार्थ आताच्या परपेक्ष लावू शकत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी या महात्म्यांची चालवलेली क्रूर थट्टा थांबवली पाहिजे. लोकांनीही या वाद-विवादात न पडता असा वाद विवादांचा समाजात बाजार मांडणार्या पक्षांचा, नेत्यांचा राजकीय बाजार उठवला पाहिजे हीच खरी आदरांजली या महात्म्यांच्या बलिदानाला असेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे