मुख्यमंत्री शपथविधीचे पत्र राज्यपाल सचिवालयात नाही
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 27, 2023
- 844
माहिती अधिकारात राज्यपाल कार्यालयाचा गौप्यस्फोट
नवी मुंबई ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी दिलेल्या पत्राची प्रत राज्यपाल कार्यालयात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी उघडकीस आणलेल्या या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश कापसे यांनी राज्यपालांनी या प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी सत्तास्थापनेसाठी दावा केला होता. सदर दाव्यासोबत त्यांना पाठिंबा असलेल्या पक्षाचे पत्र व अपक्ष आमदारांची यादी जोडली होती. राज्यपालांनी त्याचदिवशी एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य करुन त्यांना मुख्यमंत्रीपदाची तसेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यासाठी राज्यपालांनी शिंदे यांना कायदेशीर निमंत्रण देणे गरजेचे होते. राज्यपालांनी आपले घटनात्मक दायित्व निभावून शिंदे यांना शपथ दिली असेल असा समज सर्वांचा झाला होता. नवी मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जाधव यांनी राज्यपाल सचिवालयाकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिलेल्या पत्रांचा जावक क्रमांक व जावक नोंदवहीची छायांकित प्रमाणित प्रत मागितली होती. सुरुवातीला जनमाहिती अधिकाऱ्यांनी चुकीचे पत्र दिल्याने जाधव यांनी प्रथम अपिल दाखल केले. यावेळी झालेल्या सुनावणीत आणि दिलेल्या आदेशात राज्यपाल सचिवालयाच्या जावक नोंदवहीमध्ये राज्यपालांनी शिंदे व फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी पत्र पाठवल्याची नोंद दिसून येत नसल्याचा खुलासा केला आहे.
राज्यपाल सचिवालयाच्या या गौप्यस्फोटाने महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे मत संतोष जाधव यांनी व्यक्त केले आहे. राज्यपालांच्या सचिवालयाकडे माहिती मागितली असता दरवेळी ती कागदपत्रे राज्यपालांकडे असल्याचा खुलासा करणारे यावेळी ही पत्रे राज्यपालांकडे असल्याचा खुलासा करत नाहीत त्यामुळे शिंदे व फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण राज्यपालांनी दिले होते का? हा प्रश्न जाधव यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना उपस्थित केला. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाने किंवा ज्यांनी शपथ घेतली त्यांनीच ही कागदपत्रे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यापालांनी कोणताही पत्रव्यवहार हा नियमानुसार सचिवालयामार्फत करणे गरजेचे असताना जर त्यांनी वैयक्तिक स्वरुपात केला असेल तर शिंदे-फडणवीसांचा शपथविधी कायदेशीर ठरतो का? हाही प्रश्न राज्यपालांच्या या वर्तनाने निर्माण झाल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. जाधव यांनी उपस्थित केलेले कायदेशीर मुद्दे हे शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याने विरोधक हा प्रश्न कसा लावून धरतात याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
- शिवसेनेचे सूचक मौन
शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेबाबत संतोष जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जाधव यांचा खुलासा हा शिवसेनेच्या लढ्याला बळकटी देणारा असल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे. परंतु एवढ्या मोठ्या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेच्या मौनावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत. - राष्ट्रवादीचा पलटवार
जाधव यांच्या खुलाशानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश कापसे यांनी ईडी सरकार स्थापनेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फडणवीस यांनी केलेल्या खुलाशाला काही अर्थ नसून सदर खुलासा राज्यपाल किंवा त्यांच्या कार्यालयाने करणे गरजेचे आहे. कोणतीही महत्वाची कागदपत्र त्या-त्या विभागाच्या कार्यालयात जमा होणे गरजेचे असताना राज्यपालांनी ती स्वतःकडे ठेवणे ही बाब गंभीर असल्याचे कापसे यांनी सांगितले. - देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
संतोष जाधव यांनी उघडकीस आणलेल्या माहितीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर पत्रे राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचा खुलासा केला आहे. सुप्रीम कोर्टात सदर प्रकरण सुरु असल्याने सदर कागदपत्रे राज्यपालांनी आपल्याकडे सांभाळून ठेवल्याचा खुलासा केला आहे. - सत्तास्थापनेचा दावा काढणार शिंदेंसह समर्थकांची विकेट?
30 जूनला शिंदे यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला होता. शिंदेकडे फक्त 40 आमदार असताना त्यांनी कोणत्या पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. घटनेच्या शेड्यूल दहा नुसार बंडखोरांना स्वतंत्र गटाची मान्यता देण्याची तरतूद काढून टाकली असल्याने शिंदेंना पाठिंबा दिलेल्या किंवा घेतलेल्या पक्षात विलीन होणे गरजेचे आहे. त्याची जाणीव शिंदे यांना झाल्याने त्यांनी शिवसेनेत फुट पडल्याचे सांगत आमचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केंद्रिय निवडणुक आयोगाकडे केला आहे. परंतु हा दावा फुटीनंतर केल्याने त्याची वैधता किती याबाबत कायदेतज्ञ साशंक आहेत. त्यामुळे शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी केलेला दावा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांची विकेट काढणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai