राज्यात सत्तांतरण की राष्ट्रपती राजवट?
- by Aajchi Navi Mumbai
- May 05, 2023
- 759
मुंबई ः शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर उडालेला धुरळा खाली बसतो न बसतो तोच महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतरणाबाबत पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन याचा पुनरुच्चार केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्याने राज्यात सत्तांतरण होते की राष्ट्रपती राजवट लावली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तांतरणाबाबत याचिकांवरील निर्णय राखून ठेवला असून तो पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. या याचिकांवरील सूनावणी झालेल्या खंडपीठातील एक न्यायमुर्ती 15 मे रोजी निवृत्त होत असल्याने हा निर्णय पुढील आठवड्यात येणार हे निश्चित समजले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतील युक्तीवादावरुन तसेच न्यायालयाने शिंदे गटाच्या वकीलांना विचारलेल्या प्रश्नांवरुन हा निकाल ठाकरे गटाच्या बाजुने लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच या आठवड्यात केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांची घेतलेली भेट आणि नार्वेकरांचे प्रसारमाध्यमांवरील भाष्य महाराष्ट्रातील सत्तांतरणाचा पेच कायम असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचित करत आहे.
दरम्यान, अजित पवार गट व फडणवीस एकत्र येऊन नवे सरकार स्थापन करतील अशी हवा सध्या महाराष्ट्रात असताना, शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून खळबळ उडवून दिली. पक्षातील सर्व आमदारांनी व पक्षाच्या कोअर कमिटीने केलेल्या विनंतीवरुन पवार यांनी आपण राजीनामा मागे घेतल्याचे जाहीर केले. पुन्हा एकदा पवार यांनी अजित पवार यांना पक्षात एकटे पाडल्याने त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व घडामोडी सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील सत्ता बदलाबाबत कोणता निर्णय देते यावर अवलंबून असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षीय निवडीत शिवसेना पक्षाचा व्हिप नाकारला म्हणून जर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सूचक भाष्य केल्यास मग मात्र शिंदे यांना राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. राज्यात पुन्हा घोडेबाजार नको म्हणून जर सर्वोच्च न्यायालयानेच राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली तर मात्र सर्व मुसळ केरात गेल्याची भावना शिंदेंसह फडणवीसांची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच महाराष्ट्रात सत्तांतरण की राष्ट्रपती राजवट हे चित्र स्पष्ट होणार आहे.
- मी पुन्हा येईन?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरला झालेल्या कार्यक्रमात मी पुन्हा येईन या त्यांच्या गाजलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. ज्या अजित अस्त्राच्या भरोशावर त्यांनी हे वक्तव्य केले त्यावर शरद पवार यांनी राजीनामा अस्त्र चालवून अजित अस्त्र निकामी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फडणवीस आणि मुख्यमंत्रीपद यामध्ये पुन्हा शरद पवार उभे ठाकल्याने कोणाची सरशी होते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. - दादांची पक्कड ढिली?
2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी उरकून 14 दिवसाचे उपमुख्यमंत्रीपद भुषवले होते. त्यावेळी पवार यांनी अजित दादांचे बंड पद्धतशीर मोडून काढले होते. फडणवीसांशी पुन्हा हातमिळवणी करुन शिंदे सरकार गडगडल्यास अजित दादा मुख्यमंत्रीपद मिळवणार अशी चर्चा राजकारणात होती. परंतु, पवार यांनी पक्षाचा राजीनामा देवून पुन्हा एकदा दादांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे.
- आम्ही जातो आमच्या गावा...
सर्वेाच्च न्यायालयाचा निर्णय विरुद्ध गेल्यास शिंदे यांना राजीनाम्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. राज्यात झालेल्या मागील निवडणुकांत शिंदेंचा म्हणावा तसा फायदा भाजपला झाला नसल्याने त्यांनी अजित दादांना टाळी देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांच्या पुढील राजकीय भवितव्याचे काय? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. परतीचे दोर कापले गेल्याने त्यांना भाजपात जाण्याशिवाय किंवा आम्ही जातो आमच्या गावा ही भुमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai