Breaking News
मुंबई ः शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर उडालेला धुरळा खाली बसतो न बसतो तोच महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतरणाबाबत पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन याचा पुनरुच्चार केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्याने राज्यात सत्तांतरण होते की राष्ट्रपती राजवट लावली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तांतरणाबाबत याचिकांवरील निर्णय राखून ठेवला असून तो पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. या याचिकांवरील सूनावणी झालेल्या खंडपीठातील एक न्यायमुर्ती 15 मे रोजी निवृत्त होत असल्याने हा निर्णय पुढील आठवड्यात येणार हे निश्चित समजले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतील युक्तीवादावरुन तसेच न्यायालयाने शिंदे गटाच्या वकीलांना विचारलेल्या प्रश्नांवरुन हा निकाल ठाकरे गटाच्या बाजुने लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच या आठवड्यात केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांची घेतलेली भेट आणि नार्वेकरांचे प्रसारमाध्यमांवरील भाष्य महाराष्ट्रातील सत्तांतरणाचा पेच कायम असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचित करत आहे.
दरम्यान, अजित पवार गट व फडणवीस एकत्र येऊन नवे सरकार स्थापन करतील अशी हवा सध्या महाराष्ट्रात असताना, शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून खळबळ उडवून दिली. पक्षातील सर्व आमदारांनी व पक्षाच्या कोअर कमिटीने केलेल्या विनंतीवरुन पवार यांनी आपण राजीनामा मागे घेतल्याचे जाहीर केले. पुन्हा एकदा पवार यांनी अजित पवार यांना पक्षात एकटे पाडल्याने त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व घडामोडी सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील सत्ता बदलाबाबत कोणता निर्णय देते यावर अवलंबून असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षीय निवडीत शिवसेना पक्षाचा व्हिप नाकारला म्हणून जर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सूचक भाष्य केल्यास मग मात्र शिंदे यांना राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. राज्यात पुन्हा घोडेबाजार नको म्हणून जर सर्वोच्च न्यायालयानेच राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली तर मात्र सर्व मुसळ केरात गेल्याची भावना शिंदेंसह फडणवीसांची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच महाराष्ट्रात सत्तांतरण की राष्ट्रपती राजवट हे चित्र स्पष्ट होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai