Breaking News
गगराणी, कैलास शिंदे, गणेश देशमुख व दिलीप ढोले रडारवर
मुंबई ः लोकसभा निवडणुकीत केंद्रिय निवडणुक आयोगाने शिफारस करुनही सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या न केल्याबाबत गेल्या आठवड्यात नाराजी व्यक्त केली होती. राज्य निवडणुक आयोगाने अधिकाऱ्यांचा प्रत्येक जिल्हानिहाय पदस्थापनेचा अहवाल राज्य सरकारकडून मागवल्याचे सुत्रांकडून कळत आहे. दरम्यान, नवी मुंबईत गेल्या चार वर्षापासून तळ ठोकून असलेल्या अधिकाऱ्यांची यादीच नवी मुंबईतील सामाजिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने केंद्रिय निवडणुक आयोगाला सादर केली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकार करते की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रिय निवडणुक आयोगाच्या आदर्श निवडणुक आचारसंहितेत एका जिल्ह्यात चार वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची तरतूद आहे. त्यानुसार निवडणुका जाहीर झाल्यावर त्या पारदर्शकतेने होण्यासाठी एका जिल्ह्यात चार वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यात करण्यात येतात. परंतु, केंद्रिय निवडणुक आयोगाने मागील लोकसभा निवडणुकीत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना राज्य सरकारला देवूनही त्यावर कारवाई न झाल्याने गेल्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. याची दखल राज्य निवडणुक आयोगाने घेऊन राज्यात जिल्हानिहाय प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांचा पदस्थापना अहवाल मागवल्याचे सुत्रांकडून कळत आहे. दरम्यान, नवी मुंबईतील सामाजिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने ठाणे, मुंबई व रायगड जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून तळ ठोकून असलेल्या अधिकाऱ्यांची यादी सादर केली आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख व दिलीप ढोले यांचा समावेश आहे. यापैकी मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी हे 2018 पासून मुंबई जिल्ह्यात कार्यरत असून त्यांनी प्रधान सचिव नगरविकास, प्रधान सचिव मुख्यमंत्री कार्यालय व आता पालिका आयुक्त मुंबई महापालिका अशी पदे भुषवली आहेत. त्यांचा राज्य सरकारशी अतिशय जवळचे संबंध असल्याने मुंबईत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका होण्यास अडथळा ठरण्याची भिती तक्रारीत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त हे पुर्वी सिडकोमध्ये चार वर्ष सह संचालक पदावर होते. तांत्रिकदृष्टया सिडकोचे कार्यालय जरी मुंबईला असले तरी त्यांची कर्मभुमी नवी मुंबई असल्याने तेही गेली चार वर्षाहुन अधिक काळ ठाणे जिल्ह्यातच आहेत. अशाच प्रकारचा तपशील सह संचालक गणेश देशमुख व दिलीप ढोले यांच्या पदस्थापनेबाबत सदर सामाजिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने केंद्रिय निवडणुक आयोग व राज्य निवडणुक आयोग यांना ईमेलद्वारे दिला आहे. त्यात संबंधित अधिकाऱ्यांचा ठाणे व मुंबई जिल्ह्यातील पदस्थापना तपशील मागवून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, राज्य निवडणुक आयोग राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्यापुर्वी किती अधिकाऱ्यांच्या बदल्या करते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रिय निवडणुक आयोगाच्या नाराजीनंतर मात्र राज्य प्रशासनात बदल्यांची हलचल सुरु झाल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai