Breaking News
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल जाहीर
नवी मुंबई : राज्यभर खळबळ उडवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती, अशी गंभीर टिपणी करत न्यायालयाने ही शिक्षा दिली. या प्रकरणातील सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना 7 वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. मात्र, या दोघांनी तुरुंगात आधीच आपली शिक्षा पूर्ण केली असल्याने त्यांची सुटका करण्यात येणार आहे.
2015 साली नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे या महिला अधिकाऱ्याचा गूढ मृत्यू समोर आला होता. ती अचानक बेपत्ता झाली आणि अनेक दिवसांनंतर तिचा तपास सुरू झाला. तपासात समोर आले की, तिची क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यात आला होता. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा खुद्द पोलीस दलात कार्यरत असलेला अधिकारी होता. त्याच्यावर अश्विनीसोबत संबंध होते, मात्र त्यातून निर्माण झालेला संघर्ष आणि दबाव यामुळे त्याने तिची हत्या केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.
या हत्याकांडाचा तपास आणि सुनावणी तब्बल 9 वर्ष सुरु होती. अंतिम सुनावणी 11 एप्रिल रोजी पुर्ण करुन न्यायालयाने निकल राखुन ठेवला होता. सुनावणी दरम्यान न्यायालयाने पोलीस प्रशासनाची भुमिका आणि कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले होते. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की, ही हत्या क्रूर आणि अमानवी स्वरूपाची होती. एका महिला पोलिस अधिकाऱ्याशी फसवणूक करून, नंतर तिचा जीव घेण्याचे कृत्य समाजाला धक्का देणारे आहे. 21 एप्रिल रोजी न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर करताना मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेटची शिक्षा सुनावणी. तसेच महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांवर पुरावे नष्ट करणे, माहिती लपवणे आणि गुन्हेगाराला मदत करणे अशा आरोपांखाली खटला चालवण्यात आला होता. या दोघांनी शिक्षेची मुदत आधीच पूर्ण केल्यामुळे त्यांची लगेचच सुटका होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai