Breaking News
तळोजा : तळोजा औद्योगित वसाहतीतील कारखान्यांतून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने कासाडी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. याचा फटका परिसरातील मच्छीमारांना सहन करावा लागत आहे. राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी याची गंभीर दखल घेतली असून नदीचे पात्र प्रदूषित करणार्या कारखान्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
तळोजा औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडून पश्चिमेस कासाडी नदी वाहते. हाजीमलंग डोंगराच्या पायथ्यापासून स्वच्छ व पारदर्शक असा निर्मळ पाण्याचा प्रवाह या नदीतून वाहतो. परंतु नदीचा प्रवाह तळोजा औद्योगिक वसाहतीच्या जवळ येताच पाण्याचा रंग बदलतो. कासाडी नदीची प्रदूषणामुळे नाल्यात रुपातंर होत आहे. तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. पाण्याला काळा, निळा, लाल, हिरवा असे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या नदीच्या पात्रात मासेमारी करणार्या स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात नदीचे पाणी आणखी गडद होते. नदीच्या पात्रात सोडल्या जाणार्या दूषित पाण्यामुळे मासे व इतर जलजीवांना धोका निर्माण झाला आहे. मासे मृत पावण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. शिवाय या नदीत आढळणारे खेकडा, कटले, चिवणी, लहान कोळंबी, जिताडा या माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मात्र आता खुद्द पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनीच या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai