Breaking News
नवी मुंबई : मनी लाँड्रींग आणि ह्युमन ट्रफिकिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची भिती दाखवून एका सायबर टोळीने सीवूड्स भागात राहणाऱ्या एका महिलेकडुन तब्बल 61 लाख 87 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळी विरोधात फसवणुकीसह अपहार तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात फसवणुक झालेली 50 वषय महिला सीवूड्स भागात राहण्यास असून गत 22 एप्रिल रोजी सायबर टोळीतील सदस्यांनी टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी मधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधला होता. तसेच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या आधार कार्डचा वापर करुन सिम कार्ड घेतल्याचे व सदर सिमकार्डचा वापर करुन मनी लॉन्ड्रींग ह्युमन ट्रफिकींग करण्यात येत असल्याचे सांगून त्यांना घाबरवले. तसेच त्यांच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना एक तासात कुलाबा पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगितले. मात्र कुलाबा पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसल्याचे या महिलेने सांगितले असता, सायबर चोरटांनी त्यांचे ऑनलाईन इन्वेस्टीगेशन होईल असे सांगून त्याबाबत कुणाला काहीही न सांगण्यास बजावले. त्यानंतर या सायबर टोळीने सदर महिलेला नरेश गोयल नावाच्या गुन्हेगाराचा फोटो पाठवुन सदर व्यक्तीसोबत मिळून त्या मनी लॉड्रींग व ह्युमन ट्रफिकींगचे काम करत असल्याचे त्यांच्याकडे रेकॉर्ड असल्याचे या महिलेला सांगितले. तसेच त्यांचे नावाचे बँकेचे एटीएम कार्डचा फोटो व सीबीआय चौकशीची बनावट नोटीस या महिलेला पाठवून देत त्यांची सीबीआय व आरबीआय चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांना सायबर चोरट्याकडुन सांगण्यात आले.
त्यांनतर या सायबर टोळीने महिला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून या महिलेला व्हिडीओ कॉल केला. तसेच खोटी माहिती दिल्यास तिला घरी येऊन अटक करण्यात येईल अशी भिती दाखवली. त्यानंतर सायबर टोळीने या महिलेकडुन कुटुंबाची माहिती तसेच सर्व बँक खात्याची माहिती काढुन घेतली. तसेच त्यांच्या सर्व बँक खात्यावरील रक्कमेची पडताळणी आरबीआय बँक करणार असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास बजावले. तसेच चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्यांची सर्व रक्कम पुन्हा त्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.
मात्र या महिलेने तिला ऑनलाईन ट्रान्झेक्सन करता येत नसल्याचे सांगितले असता, त्यांना बँकेत जाऊन आरटीजीएस द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने सायबर टोळीने दिलेल्या दोन बँक खात्यावर तब्बल 61 लाख 87 हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर या टोळीने त्यांना आता अटक होणार नसल्याचे व त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात पाठवण्यात येईल असे सांगितले. मात्र तीन चार दिवसानंतर देखील सदर रक्कम न आल्याने या महिलेने सर्व प्रकाराची माहिती आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिची फसवणुक केल्याचे पतीने सांगितले. त्यानंतर या महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai