आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2026
- 26
जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांचे निर्देश
अलिबाग : रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारी आढावा-2026 च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दल चे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक, आदि उपस्थित होते. पावसाळा सुरु होण्याकरिता 1 महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक आणि धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे, यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. आपत्ती काळात आपदामित्रांचे सहकार्य खूप महत्वाचे असून ते तात्काळ मदतीला धावून येवून महत्वाची भूमिका बजावत असतात. याकरिता आपदा मित्र रायगड जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. प्रत्येक विभागांनी आपला नियंत्रण कक्ष चोवीस कार्यान्वित ठेवून याकरिता एका समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक करावी. जलसंपदा विभागाने आपल्या अखत्यारित असलेली धरणे, मध्यम प्रकल्पांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा औषधसाठा, व्हॅक्सीन उपलब्ध ठेवाव्यात. आपत्तीकाळात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठविण्यात यावेत. रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करुन आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्याने धरणातून विसर्ग करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तसेच या काळात पूर्व परवानगी शिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये, असे निर्देश देखील जावळे यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या की, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी समन्वयाने आढावा बैठका घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे. सदर बैठकीत प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एनडीआर एफ, होमगार्डा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे अधिकारी यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पीडब्ल्यूडीने धोकादायक पुलांची तपासणी करुन आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी आणि पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिपलेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध आणि बचाव साहित्यांची दुरुस्ती करुन सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध आणि बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटर आदि साहित्य आणि मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.
या काळात उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका, महापालिकांनी नालेसफाईची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करावीत. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आदि विभागांनी देखील नागरिकांच्या मदत आणि सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. दरड प्रवण गावांकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी गावातील लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आम्ही तुम्ही एक आहोत, या भावनेने सर्वांनी काम करावे. -किशन जावळे, जिल्हाधिकारी-रायगड
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai