Breaking News
महाराष्ट्रात सध्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धुमाकूळ घातला आहे. केंद्रसरकारचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभाग यात आघाडीवर असून ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना हाताशी धरून त्याचे काम सुरु आहे ते पाहिले कि जाणवते घराघरात सध्या अंमली पदार्थाचे सेवन तरुणाई कडून होत असून संपूर्ण महाराष्ट्राला नशेली पदार्थाने व्यापले आहे. गेल्या वर्षी याच काळात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शुभम याला नार्कोटिक्स विभागाने अंमली पदार्थाच्या सेवनासाठी अटक केली होती. खरंतर सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक होणार अशी अटकळ प्रसारमाध्यांनी बांधल्यावर ते शक्य होत नाही हे दिसल्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या विभागाची एन्ट्री या प्रकरणात होते. त्यानंतर सुशांतसिंह मृत्यूची बातमी मागे सरून महिनाभर जो धागडधिंगाणा गोदी मीडियाने अंमली पदार्थांबाबत समाजमाध्यमांवर घातला त्याला तोड नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणार्या आणि लाखो लोकांना रोजगार देणार्या बॉलिवूड जगताला बदनाम करण्याचे उद्दिष्ट यामागे होते हे गोदी मीडियाच्या प्रचार आणि प्रसारावरून दिसून येते.
देशात सध्या आत्मकेंद्री हिंदुत्वाची आणि राष्ट्रभक्तीची लाट ठराविक काळात उठताना दिसत आहे. देशभक्तीच्या या लाटा एखाद्या राज्यात निवडणूक असल्याने कशा उसळतात हाही संशोधनाचा विषय ठरावा. गेल्या सत्तर वर्षात या देशाने अनेक निवडणूका पाहिल्या परंतु ज्या तीव्रतेने गेल्या सात वर्षात निवडणुका लढवल्या जात आहेत ते निश्चित घातक आहे. सुशांतसिंह मृत्यूच्यावेळी बिहार राज्यातील निवडणुका होत्या. त्या निवडणुकात सुशांतसिंह याच्या मृत्यूचे भांडवल करत मत मागणारे पोस्टर्स बिहारमध्ये लावले. उत्तरप्रदेशमध्ये तर नवीन फिल्मसिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करून मुंबईत महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांशी बैठकाही घेतल्या. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील लहान-सहान प्रकरणांना हवा देण्यात येत आहे त्यावरून महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी मोठी यंत्रणा यामागे कार्यरत असल्याचे जाणवते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यावर घाला घालण्याच्या या षडयंत्रात महाराष्ट्रातील भाजप आघाडीवर असल्याचे जाणवते. महाराष्ट्रात मराठेशाही बुडाली आणि पेशवाई कशी आली या इतिहासाचा अभ्यास केल्यास राज्यात पुन्हा काळचक्र उलटे तर फिरत नाही ना याचा भास होतो.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 20 दिवसांपूर्वी क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड टाकून अंमली पदार्थाच्या सेवन प्रकरणी ताब्यात घेतले. आर्यन खान क्रूझवर होता किंवा नाही हाही संशोधनाचा विषय असून त्याच्या वकिलांनी त्याबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आर्यन खान याच्याकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचा खुलासा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांनी न्यायालयात केला असून त्याच्या मेडिकल रिपोर्ट मध्येही त्याने सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आर्यन खानला कशासाठी अटक करण्यात आली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरुवातीला आर्यनने अंमली पदार्थाचे सेवन केले असे गृहीत धरून अटक केल्यानंतर मेडिकल रिपोर्टने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे डोळे खाडकन उघडले. त्यामुळे मग कातडी वाचवण्यासाठी व्हाट्सअप चॅटचा आधार घेण्यात आला असावा असे वाटते. ज्यापद्धतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आपली न्यायालयातील भूमिका वेळोवेळी बदलली त्यावरून तर असे जाणवते कि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे या प्रकरणी ठोस असे काही नसावे. वॉट्सअप चॅटमध्ये अंमली पदार्थांच्या या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय कटाचे स्वरूप देण्यात येऊन आर्यन जास्तीस जास्त कोठडीत कसा राहील हे पाहण्यात येत आहे. या कारवाईत ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांचा समावेश उघड झाला, साक्षीदारांच्या निस्पृहतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले त्यावरून तरी हे प्रकरण साधे-सुधे नसल्याचा अंदाज येत आहे. कोणत्यातरी अनामिक भावनेने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो काम करत असल्याचे दिसत आहे.
खरंतर आर्यन याचा गुन्हा अक्षम्य नक्कीच नाही. पण अशाप्रकारच्या गुन्ह्याला न्यायालयीन कोठडी देऊ नये या मताचे आम्ही आहोत. आर्यन हा 21 वर्षाचा तरुण आहे. अंमली पदार्थाच्या सेवनाची त्याला सवय असेल तर त्याला सुधारगृहात टाकायला हवे. त्याचे काऊन्सलिंग व्हायला हवे आणि तो पुन्हा त्या मार्गावर जाणार नाही याची काळजी समाज म्हणून आपण सर्वानी घ्यायला हवी. जसा आर्यन रस्ता चुकला तशीच चूक उद्या कोणत्याही कुटुंबातील तरुण करू शकतो हे कटू सत्य आहे. अशावेळी त्या कुटुंबाला आणि त्या मुलाच्या पाठीमागे संपूर्ण समाजाने उभे राहणे हेच तर सुदृढ समाजाचे लक्षण आहे. पण इथे काय सुरु आहे याचा विचार केल्यास अंगावर काटा येतो. न्यायालयीन कोठडीत अट्टल गुन्हेगारांचा वावर असतो आणि अशा गुन्हेगारांसोबत कोवळ्या मनाच्या मुलांना ठेवणे हे त्याच्या गुन्ह्यांपेक्षाही घातक आहे. कधी-कधी या वयातील मुले सुधारण्याऐवजी मग अट्टल गुन्हेगार बनून बाहेर पडतात त्याचा विचारही न्यायालयांनी करणे गरजेचे आहे. शेवटी कायदे हे समाज निकोप ठेवण्यासाठी बनले असून ते कोणाची राजकीय तृष्णा भागवण्यासाठी किंवा धर्माच्या ध्रुवीकरणासाठी न वापरता समाजाला कायद्याचा धाक आणि आदर निर्माण करण्यासाठी वापरणे हिताचे ठरेल. त्यामुळे आर्यनच्या जामिनाबाबत उच्य न्यायालयाततरी याबाबत निदान चर्चा होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
आर्यनच्या अटकेला प्रसारमाध्यमे एवढे का महत्व देत आहेत याचे उत्तर गुजरात मधील अडाणी समूहाच्या मुंद्रा बंदरात सापडलेल्या 21000 हजार कोटी रुपयांच्या अमलीपदार्थांच्या तस्करी प्रकरणात आहे. मुंद्रा बंदरात 3000 किलो अंमली पदार्थ सापडुनही कोणत्याही प्रकारची चर्चा प्रसारमाध्यमांत करण्यात आली नाही. पण काही ग्रॅम अंमली पदार्थ सापडलेल्या प्रकरणाला ज्या पद्धतीने हवा देण्यात आली त्यावरून मुंद्रा वरून लक्ष हटवण्यासाठी तर हे कुभांड रचण्यात आले नाही ना अशी शंका येते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या विभागाचे महत्वाचे कार्य देशात येणारे अंमली पदार्थ देशाच्या सीमेवर रोखण्याचे आहे. परंतु देशाच्या सीमांचे रक्षण करणार्यांची नजर चुकवून राजरोस हजारो किलो अंमलीपदार्थ देशात येतो कसा ? हा खरा कळीचा मुद्दा आहे. लाखो कोटींची मुद्रा या व्यवहारात असून हा कारभार असाच भविष्यातही अव्याहत सुरु राहणार आहे. देशाच्या सीमा आणि कस्टम विभागाला त्यादृष्टीने सतर्क आणि सक्षम करणे गरजेचे असताना ते सेवन करणार्यांवर चिरकूट कारवाई करून स्वतःची पाठ थोपटणार्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. देशात अंमली पदार्थ सापडणे हे खरे तर केंद्र सरकारचे अपयश आहे कारण देशाच्या सीमा, बंदरे आणि कस्टम विभाग हा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून प्रसारमाध्यांना हाताशी धरून सरकार देशांर्गत करत असलेला कारवाईच्या देखाव्याचा इलाज तर रोगाहून भयंकर आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या व्यवहाराला जर खरोखरच अटकाव घालून तरुणांचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल तर मुंद्रा ते मुद्रा हा प्रवास वेळीच रोखायला हवा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे