Breaking News
देशात गेल्या महिन्याभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या असल्यातरी प्रामुख्याने महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी अजूनही संपलेल्या नाहीत. बिहारमध्ये घडलेल्या राजकीय घटनांनी भारतीय जनता पक्षाची झोप उडवली आहे. आतापर्यंत भाजपा विरोधी पक्षांची सरकार पाडून विरोधकांची बत्ती गुल करत असल्याचा अनुभव गेली आठ वर्ष विरोधक देशात अनुभवत होते. परंतु पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी भाजपचेच सरकार पाडून बिहारमध्ये पुन्हा लाल-टेन पेटवल्याने सध्या देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांचे सरकार पडण्याची सुतराम शक्यता नसतानाही केवळ ठाकरे यांच्या अनावश्यक भावनिक राजकारणामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले आहे. स्वतःच्या आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी पक्षाशी बांधिलकी दाखवणारे शपथपत्र कार्यकर्त्यांकडून गोळा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या ठिकाणी खुद्द बाळासाहेब असते तर त्यांनी कसलीही तमा न बाळगता प्रसंगी पक्षाचे चिन्ह राहील कि नाही याचा विचार न करता थेट बंडखोरांना अंगावर घेतले असते. पण पक्ष आणि सत्ता कोणताही संघर्ष न करता मिळाल्याने त्याचबरोबर सदैव दरबारी राजकारणात रमल्याने शिवसेनेच्या अस्तित्वावरच आज प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नितीशकुमार यांनी ज्यापद्धतीने राजकीय बुद्धिचातुर्याचा वापर करून भाजपच्या चाणक्याला बिहारी तडका दिला त्यावरून तरी राजकारणात भावनेला थारा नाही याचा उद्धव यांना नक्कीच प्रत्येय आला असेल.
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी भाजप सोबत काडीमोड घेऊन पुन्हा राष्ट्रीय जनता दल सोबत युती करत सत्तेचे दोर आपल्या हातात ठेवले. गेल्या चार महिन्यांपासून भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याची वेळीच दखल घेऊन नितीश कुमार यांनी कोणाचीही तमा न बाळगता आपल्या जवळच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणार्या अजय आलोक सारख्या लोकांना खड्यासारखे बाजूला सारले आणि योग्य वेळी काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल सोबत युतीकरून महाराष्ट्रातील पुनरावृत्ती टाळली. याउलट सुरुवातीला एकनाथ शिंदे सतरा आमदार घेऊन सुरतला गेले असतानाही उर्वरित आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केले नाहीत. रोज एक नवीन आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत असताना ठाकरे मात्र ‘या चिमण्यांनो परत फिरा’ म्हणून अंगाई म्हणत राहीले. हाच फरक आहे शून्यापासून राजकारणाचे धडे गिरवणार्या आणि आयते नेतृत्व करणार्या नेत्याच्या प्रवृत्तीत.
नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकी संदर्भात थेट आव्हान दिले आहे. खरंतर 2019 च्या निवडणुकीत नितीशकुमार हे विरोधी पक्षांचे संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी अटकळ त्यावेळी भाजपने बांधली होती. या गोष्टीची जाणीव मोदी यांना होती व त्याला अनुसरूनच नितीश यांना आपल्याकडे वळवून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांचे सरकार पाडले. सत्तावीस-अठ्ठावीस वर्ष वय असलेल्या तेजस्वीनेही कच न खाता विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार व मोदी या दोघांनाही चांगलीच टक्कर दिली. त्यांचा विजय काही आमदारांच्या संख्येने जरी हुकला असला तरी जनमताचा कौल तेजस्वी यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात होते. शेवटच्या फेरीत 8-10 आमदारांच्या फेरमतदान मोजणीत कौल तेजस्वी यांच्या उलट गेला. पण ‘देवाच्या लाठीत आवाज नसतो’ याचा प्रत्यय त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नक्कीच आला असेल.
नितिशकुमार यांनी वेळ साधली ती नऊ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिनाची. यादिवशी महात्मा गांधीनी इंग्रजांना ‘भारत छोडो’चा नारा दिला. या दिवशी नितीश कुमार यांनी भाजपचे सरकार पडून मोदींच्या भाजपाला देश छोडोचा नारा दिला आहे. येणारा काळ हा बिहारसह अन्य राज्यातील विरोधकांसाठी अतिशय खडतर असणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळाले तर त्यानंतर देशात होणार्या निवडणुका या नाममात्र असतील. कोणत्याही राज्यात सत्ता नसल्याने विरोधकांची मोठी आर्थिक कोंडी होऊन ते भाजपा समोर टिकू शकणार नाही. त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूक ही विरोधकांसाठी करू अथवा मरू अशीच राहणार आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात व राजस्थान या येत्या सहा महिन्यात निवडणुका होणार असून नितीश कुमार यांच्या या खेळीचा मोठा परिणाम तेथील निवडणुकांवर होईल. त्यातच केजरीवाल यांनी गुजरातमध्ये तळ ठोकून मोदी यांना त्यांच्या मैदानात घेरण्याची रणनीती आखल्याने 2024 ची लोकसभा निवडणूक ही हिंदी भाषिक प्रदेशात कोणत्या पक्षाला सत्ता मिळते यावर निर्भर असणार आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीला अजून दोन वर्ष बाकी आहेत. महाविकास आघाडीचे सरकार जरी गेले असले तरी काही महिन्यात पुन्हा महाविकास आघाडीला सत्ता मिळू शकते असा कयास आहे. सर्वकाही सर्वोच्च न्यायालयाच्या हातात असून त्यांचा निर्णय काय येतो यावर महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. पवार यांनी राजीनामा देऊ नको असे सांगूनही आपलेच आमदार आपल्या विरोधात मतदान करणार ह्या अविचाराने भावनेच्या भरात दिलेला राजीनामा आज सेनेच्या मुळावर आला आहे. राजकर्त्याने निर्णय कसे घ्यावेत याचा धडा नितीशकुमार यांनी घालून दिलेला आहे. राजकारणातील एखादी अविवेकी ‘भावना’ कशी विनाशाकडे घेऊन जाते याचा प्रत्येय उद्धव आणि आदित्य यांना आला असेल. त्यामुळे यापुढे केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेईल या ‘भावने’त न गुंतता मराठी माणसाच्या आणि राज्याच्या हितार्थ पुन्हा रान उठवावे...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे