Breaking News
महाराष्ट्राच्या रंगभूमीवर "सौजन्याची ऐशी तैशी" हे विनोदी नाटक फार गाजले होते. अतिसौजन्यामुळे नाटकातील पात्रांची कशी तारांबळ उडते हा या नाटकाचा गाभा होता. त्याचप्रकारे मुख्य न्यायाधीशांच्या अतिसौजन्याने व मोदी यांच्या गणेश भक्तीने चंद्रचूड यांची न्यायालयाच्या रंगभूमीवर तारांबळ उडाली व त्याचे पडसाद समाज माध्यमांवर उमटले. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या "सौजन्याची ऐशी तैशी" या नाटकाचे स्मरण झाले. दोन्ही रंगमंचावर मराठी माणूस असल्याने त्याचा गोडवा वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन घेतलेले गणपतीचे दर्शन आणि केलेली आरती यामुळे सध्या धुळवड उडवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य न्यायाधीशांच्या घरी स्वतःहून गेले हे पचनी पडणे थोडे अवघडच आहे. मुख्य न्यायाधीशांच्या आमंत्रणावरूनच पंतप्रधान त्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेले असतील असे मानण्यास हरकत नाही. देशातील महत्त्वपूर्ण घटनात्मक संस्था मोदी सरकारने ताब्यात घेतल्या असा आरोप विरोधक करत असताना अतिसौजन्याने मुख्य न्यायाधीशांनी आपल्या घरी पंतप्रधानांना गणेश दर्शनाचे आमंत्रण दिले असेल तर ते विरोधकांच्या आरोपांना दुजोरा देणारे आहे. लोकांच्या जीवन-मरणाचा निर्णय करणाऱ्या चंद्रचूड यांनी या भेटीच्या परिणामांचा विचार केला नसेल असे मानणे म्हणजे वेड पांघरून पेड गावला जाण्यासारखे आहे. त्यामुळे चंद्रचूड यांच्या या आमंत्रणाकडे लोक विशिष्ट चष्म्यातून निश्चित पाहणारच. फुकटच्या अतिसौजन्याने सौजन्याची कशी ऐशी तैशी होते हे पाहण्याचे सौभाग्य या देशवासीयांना गणेश जयंतीच्या निमित्ताने मिळाले हेही नसे थोडके.
गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील अनेक घटनात्मक संस्थांवर आपला ताबा मिळवला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामध्ये निवडणूक आयोग, सीबीआय व प्रवर्तन निर्देशनालय सारख्या संस्थांचा समावेश आहे. निदान आतापर्यंत विरोधकांनी न्यायपालिकेच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दहा वर्षात दिलेले अनेक निर्णय जरी वादातीत असले तरी त्याबाबत न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होईल अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य विरोधकांनी किंवा सर्वसामान्य जनतेकडून करणे टाळले होते. काही निर्णय सर्वसामान्य जनतेला रुचले नव्हते. या निर्णयांबाबत बऱ्याच बोलक्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्या. स्टँड अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांने गरिब-श्रीमंतांसाठी न्यायपालिका कशा पद्धतीने काम करते याचे वर्णन मोजक्या शेलक्या शब्दात केले. त्याबाबत त्या व्यक्तीला न्यायालयाच्या अवमाननेला सामोरे जावे लागले. त्यामुळे सर्वसाधारणपणे न्यायपालिकेला कोणत्याही वादापासून दूर ठेवावे असे जर सर्वाना वाटत असेल तर वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचे पहिली जबाबदारी न्यायपालिकेची व न्यायाधीशांची आहे. पण न्यायपालिका व न्यायाधीश ही जबाबदारी आणि सिद्धांतिक मूल्ये जपतात का हाच खरा यक्षप्रश्न आहे.
पंतप्रधान आणि सरन्यायाधीश याआधीही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटत आले आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मोदींनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले व आरती देखील केली. याआधी कधीही पंतप्रधान किंवा कोणी राजकीय व्यक्ती अशा प्रकारे सरन्यायाधीशांच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले नव्हते. या भेटीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पंतप्रधानांना आमंत्रण देणे व पंतप्रधान यांनी त्यांच्या घरी जाणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत तसेच त्यांच्या भेटीचा फोटो प्रसारित करणे चुकीचा आहे असे सांगितले. चंद्रचूड यांनीही अशी कृती करण्यापूर्वी हजारवेळा विचार करायला हवा होता अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कृतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याही पुढे जाऊन सुपरीचिट वकील इंदिरा जयसिंह यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्या अधिकारांची वाटणी झालेली असते त्याच्याशी तडजोड केली आहे असे सांगत सरन्यायाधीशांच्या निष्पक्ष भूमिकेबाबत विश्वास उडाल्याचेची प्रतिक्रिया दिली आहे. समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय बोलक्या असून यापुढे भविष्यात न्यायालयाच्या रंगमंचावर कोणत्या घटना घडतील हे सांगणे अवघड आहे. सरन्यायाधीशांची भूमिका त्यांच्या समकालीन न्यायाधीशांनाही पटली आहे की नाही हे समजणे अवघड आहे. त्यांच्याही मनात या भक्ती भेटीनंतर निश्चित काही प्रश्न उपस्थित झाले असतील. त्यामुळे सरन्यायाधीश व समकालीन न्यायाधीश यांच्यात भविष्यात कसे संबंध राहतील हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात सन्यायाधीशांपुढे अनेक महत्त्वाचे राजकीय खटले प्रलंबित आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला महत्त्वाचा असून त्यात भाजप पक्षकार नसला तरी घडामोडींचा सूत्रधार आहे. त्याचा थेट संबंध भाजपशी असल्याने या भेटीचा निश्चित परिणाम न्यायालयीन कामकाजावर होईल अशी भीती अनेकांनी व्यक्त केल्याने प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या सार्वभौमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतकी वर्ष सर्वोच्च न्यायालयाने जपलेली प्रतिष्ठा सरन्यायाधीशांच्या अतिसौजन्याने पणाला लागली. यापुढे सरन्यायाधीश ज्या खंडपीठाचे सभासद असतील त्याकडे खटले चालवण्यास विरोधी पक्ष धजावेल का? हा प्रश्न आहे. एखादा निर्णय प्रतिकूल गेल्यास त्यावेळी काय प्रतिक्रिया येतील हाही प्रश्नच आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारविरोधात दिलेल्या अनेक निर्णयांमुळे त्यांच्यावर भारतीयांना प्रचंड विश्वास आहे. हि घटना अनावधानाने घडली असेल किंवा त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मालिन करण्यासाठी घडवण्यात आली असेल. पण एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर आणि विरोधी वातावरणात काम कारणाऱ्या व्यक्तीला अष्टावधानी असणे गरजेचं आहे. सरन्यायाधीश यांना भेटण्यासाठी विघ्नहर्ता गणेश जयंती उत्सव निवडण्यात आला. त्यामुळे विघ्नहर्ता आता कोणाचे विघ्न हरतो हे आगामी काळ ठरवेल. पण नकळत का होईना न घडायचे ते घडले त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सत्वच पणाला लावणाऱ्या सरन्यायाधीशांनी प्रायश्चित्त घ्यावे हेच उत्तम. ते काय असेल हे मात्र त्यांनीच ठरवावे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे