पर्यावरण संवर्धनासाठी ‘हरित विभाग स्पर्धा’
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 29
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील व्दितीय क्रमांकाचे मानांकित पर्यावरणशील शहर आहे. या अनुषंगाने शहरामध्ये लोकसहभागातून पर्यावरण जतन व संवर्धनाची चळवळ उभी रहावी यादृष्टीने ‘हरित विभाग स्पर्धा’ आयोजित करण्यात येत असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी नुकतेच कोपरखैरणे येथील निसर्गेद्यानात संपन्न झालेल्या वृक्षारोपण समारंभप्रसंगी जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी परिपत्रक जारी केले असून हरित विभाग स्पर्धेमध्ये पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्याने, ट्री बेल्ट, रस्ता दुभाजक व चौक नीटनेटके ठेवण्यासाठी व रहिवास क्षेत्राभोवतालच्या परिसरातील हिरवळ वाढवून नवी मुंबईला स्वच्छ व हरित शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी पर्यावरण रक्षक व संवर्धक अशी विभागनिहाय ‘हरित विभाग स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. उद्यानांची जोपासना करीत असताना नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून शहरातील हरित आच्छादन वाढवावे व नवी मुंबई परिसरात ज्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यास वाव आहे अशा ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपात सुशोभिकरण करण्याचे उद्दिष्ट साकारण्यासाठी या हरित विभाग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचा कालावधी ऑगस्ट 2026 ते मार्च 2027 पर्यंत राहील. सदर कालावधीत विभाग स्तर अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांचे नियंत्रण व मार्गदर्शनाखाली विभाग जास्तीत जास्त हरित व सुशोभित होईल यादृष्टीने कामकाज अपेक्षिलेले आहे. त्या अनुषंगाने विभाग अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून अंमलबजावणी करून घ्यावयाची आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती करून व्यापक लोकसहभागातून विविध उपक्रम राबवावयाचे आहेत.
स्पर्धेचे निकष
1. नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित उद्यानाचे सुशोभिकरण करणे.
2. प्रदूषण नियंत्रणासाठी देशी व वनस्पतीजन्य वृक्ष प्रजातीची लागवड
3. उद्याने, रस्ते व मोकळ्या जागांचे सुशोभीकरण
4. जैवविविधता जोपासण्यासाठी केलेले वनीकरण
5. पर्यटनास उपयुक्त उद्यान
6. रोपवाटिकेत लागवड केलेली विशेष फुलझाडे व फळझाडे
7. शालेय विद्यार्थ्यांचा समावेश करून वृक्ष संवर्धन व जोपासना संबधित उपक्रम राबविणे.
8. सीएसआरच्या माध्यमातून हरित क्षेत्र वाढीस उपयुक्त असे विविध उपक्रम हाती घेणे.
9. महानगरपालिकेमार्फत सुरू असलेले उद्यान देखभाल व संवर्धनाच्या दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण.
10. उद्यान विभागात प्राप्त होणाऱ्या ऑनलाईन तक्रारींचा जलद निपटारा करणे.
11. खाजगी तसेच सार्वजनिक विकास प्रकल्पामध्ये बाधीत होत असणाऱ्या वृक्षांपैकी जास्तीत जास्त वृक्ष वाचविण्याच्या दृष्टीने वृक्ष स्थलांतर करणे व स्थलांतरित वृक्षाचे संवर्धन करण्याकरिता उपाययोजना करणे.
12. वृक्ष दिंडी कार्यक्रम, बीज संकलन, हरित कचऱ्यापासून खत निर्मिती, झाडांच्या शुष्क अवशेषापासून सुशोभिकरण इ. माध्यमांतून जनजागृती कार्यक्रम राबविणे.
13. पुरातन वृक्षांची जोपासना करणे.
14. आपण केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा पूर्वीचा फोटो व केल्यानंतरचा फोटो आवश्यक राहील.
या हरित विभाग स्पर्धेत, नवी मुंबई महापालिकेच्या सर्व 8 विभाग कार्यालयांचा समावेश असेल व आपला विभाग हरित व आदर्श बनवण्यासाठी सर्व साधनांचा वापर करुन या स्पर्धेचे नियोजन करावे असे प्रस्तावित आहे. सदर स्पर्धेचा कालावधी 31 मार्च 2027 पर्यंत राहील. या कालावधीत विभाग स्तरावर विभाग अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांचे नियंत्रण व मार्गदर्शन राहील. त्यांनी आपला विभाग जास्तीत जास्त हरित, सुंदर व सुशोभित होईल यादृष्टीने कामकाज करावयाचे आहे. त्या अनुषंगाने विभाग अधिकारी तथा वृक्ष अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी समुहाच्या सहाय्याने आवश्यक कामे करून घ्यावयाची आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर द्यावयाचा आहे.
स्पर्धेच्या 8 महिन्याच्या कालावधीत प्रभागनिहाय ग्रीन प्रोफाईल तयार करणे आणि जनजागृती करणे, प्रभागांमध्ये प्रत्यक्ष कामे, वृक्षारोपण, सुशोभिकरण आणि नागरिकांचा सहभाग इ. बाबींवर काम करावयाचे आहे. स्पर्धेच्या अंतिम 15 दिवसात केलेल्या कामाचे मूल्यमापन, गुणांकन होईल आणि अंतिम निकालाची घोषणा करण्यात येईल. या कामाचे मूल्यमापन पारदर्शक व्हावे यादृष्टीने उपआयुक्त (उद्यान) यांच्या अध्यक्षतेखाली नामांकित पर्यावरण संस्था/स्वयंसेवी संस्था यांच्या पर्यवेक्षण नियंत्रण समितीकडून अंतिम परीक्षण केले जाईल. या ‘हरित विभाग’ अर्थात ‘ग्रीन वॉर्ड’ स्पर्धेच्या माध्यमातून विभागाविभागांमध्ये निकोप स्पर्धा होऊन नवी मुंबईच्या हरित विकासाला चालना मिळेल आणि लोकसहभागावर भर दिल्याने पर्यावरणविषयक जाणीवजागृती होऊन लोकचळवळ उभी राहील असा विश्वास महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai