कांदळवन क्षेत्रातील विकास प्रकल्प मार्गी लागणार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 12, 2021
- 621
नवी मुंबई ः नवी मुंबईत अनेक नवनवे प्रकल्प उद्यास येत असून यामुळे शहर पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केले. येथील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कांदळवन परिसरातील समस्यांबाबत खा. राजन विचारे यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्यांच्या समवेत ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्र येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विकास प्रकल्पावर महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खाडीकिनारी अपूर्ण अवस्थेत विकसित करण्यात आलेला पामबीच वरील रस्ता जोडण्यासाठी घणसोली-ऐरोली दरम्यान कांदळवनच्या जागेतून 1.95 किलोमीटर लांबीचा पूल तयार करण्यासाठी कांदळवन विभागाला आवश्यक असणारी 4.0122 हेक्टर (10 एकर) पर्यायी जागा मीरा भाईंदर येथील राज्य शासनाची जागा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू करण्याचे आदेश या बैठकीमध्ये घेण्यात आले. तसेच पामबीच येथील सायकल ट्रॅक विकसित करण्यासाठी आवश्यक असणार्या परवानगी मिळवून देण्यात आली आहे. तसेच गवळीदेव सुलाईदेवी या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारी वाइल्ड लाइफची ना हरकत देण्यात आली आहे. ऐरोली खाडी किनारी खूप मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो पक्षांचा वावर असल्याने याठिकाणी त्या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत. त्यामुळे या कांदळवन परिसरात 14 एकर जागेवर किनारी व सागरी जैवविविधता केंद्राच्या विकासासाठी खा. विचारे यांनी 40 कोटी निधी उपलब्ध करून घेतला होता. याची स्थिती जाणून घेताना सदर प्रकल्पाला या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. या परिसरात पर्यावरण प्रेमींसाठी पर्यावरण पूरक परिसराचा विकास होणार असून जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी आकर्षित होणार आहेत. विचारे यांनी या परिसराचा बोटीतून पाहणी दौरा करून जेट्टीची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी. तसेच पर्यटकांसाठी नव्याने बोटी खरेदी करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. लवकरात लवकर पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अपर प्रधान कांदळवन मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी खा. विचारे यांना दिले.
- तलावातील गाळ काढण्यास परवानगी
गेल्या अनेक वर्षापासून वंश परंपरागत मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्या नवी मुंबईतील आगरी कोळी मच्छीमारांच्या तलावातील गाळ काढण्यासाठी कांदळवन विभागा मार्फत बंदी घालण्यात आली होती. खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत तलावातील गाळ काढण्याची परवानगी देण्यात यावी तसेच तामिळनाडू येथे आपल्या विभागामार्फत मच्छिमारांसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्याच धर्तीवर त्यांनाही आपण त्या योजना सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. त्यावर अपर प्रधान मुख्य कांदळवन वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी या नवी मुंबईत 400 ते 500 तलाव असून टप्प्याटप्प्याने तलावातील गाळ डिसेंबरपर्यंत काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु गाळ काढताना कांदळवनाचे नुकसान होता कामा नये तसेच सदर गाळ काढताना कांदळवन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीतच गाळ काढण्यात येईल या अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे. या गाळ काढण्यासाठी पहिली सुरुवात कोपरखैरणे, बनकोडे, घणसोली, तळवली, गोठवली येथून करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai