नवी मुंबईतील लाखो मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता?
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 20
प्रक्रियेतील त्रुटींवर नागरिकांकडून प्रश्नचिन्हल
नवी मुंबई : मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहिमेवर नवी मुंबईत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघ क्रमांक 150 आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 151 मधील मतदार पडताळणी प्रक्रियेत विविध त्रुटी व अडचणी निर्माण झाल्याने पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एसआरए मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर यांच्यामार्फत मतदारांच्या घरभेटी, माहितीची पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख आणि छायाचित्रातील चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बीएलओ घराघरांत पोहोचले नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गणना अर्ज मिळविण्यासाठी अनेकांना बीएलओचा शोध घ्यावा लागत आहे. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतरही काही नागरिकांना ऑफलाइन फॉर्म भरण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, 2002 च्या मतदार यादीतील माहितीबाबत नागरिकांना वारंवार बोलावले जात असल्याची तक्रार आहे. प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त अतिरिक्त कागदपत्रांची मागणी काही ठिकाणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक मतदारांनी फॉर्म जमा करूनही त्यांची माहिती ॲपवर वेळेत अपडेट झाली नसल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणांत जमा केलेले फॉर्म हरविल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
विशेष म्हणजे, फॉर्म जमा केल्यानंतर मतदारांना कोणतीही प्राप्ती प्रत दिली जात नसल्याने भविष्यात फॉर्म जमा केला होता की नाही, याचा पुरावा मतदारांकडे राहणार नसल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. काही मतदारांना नॉन ॲपलिकेबल म्हणून नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अशा काही मतदारांचे प्रत्यक्ष वास्तव्य संबंधित ठिकाणी असतानाही त्यांची प्रत्यक्ष पडताळणी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘नॉन ॲपलिकेबल’ म्हणून नोंद झालेल्या मतदारांची पुन्हा प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, नावातील किरकोळ स्पेलिंगच्या चुका असल्यास फॉर्म नाकारले जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. काही बीएलओ नागरिकांनाच 2002 मधील माहिती शोधून आणण्यास सांगत असल्याचे नागरिकांकडून समजते. मोहिमेची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून घाई केली जात असून प्रत्यक्ष पडताळणीऐवजी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्यास पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि पात्र नागरिकांचे नाव कायम ठेवणे हा एसआरएचा उद्देश असताना, प्रक्रियेतील त्रुटींमुळेच पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याची गरज आहे. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील सर्व मतदारांची पडताळणी पारदर्शक पद्धतीने करून, फॉर्म जमा केलेल्या प्रत्येक मतदाराला प्राप्तीची पावती देण्यात यावी आणि ‘एनए’ म्हणून नोंदवलेल्या मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
एसआयआर प्रक्रियेत काही बीएलओ हे कामचुकार व हलगर्जी करतात, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत राजा असलेल्या मतदारांना नावे वगळल्याने त्यांना मतदानाच्या सार्वभौम हक्कापासून वंचित ठेवले जाऊ शकते.म्हणून निवडणूक विभागाने पुनःरिक्षणाच्या या मोहिमेचा कालावधी पुढे वाढवावा, विशेषतः नियुक्त बीएलओंना अधिक जबाबदारीने व कर्तव्यपूर्ती ने कार्य करण्यास प्रोत्साहनपर सूचना द्याव्यात. - दशरथ भगत, उपमहापौर, नवी मुंबई म्हनगरपालिका.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai