Breaking News
देवेंद्र फडणवीस यांचे नवी मुंबईत वक्तव्य
नवी मुंबई : 2019 विधानसभेतच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वक्तव्य खूप गाजल्यानंतर आता तर चक्क ‘मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे’ असे विधान फडणवीसांनी नवी मुंबईत केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात नविन चर्चा सुरु झाली आहे.
नवी मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे’ असं विधान केलं आहे. तुमच्या सारखे नेते पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवला नाही की मी मुख्यमंत्री नाही, मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गेली दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही, की आता मी मुख्यमंत्री नाहीए, विरोधी पक्ष नेता म्हणून मी उत्तम काम करतोय, आणि ज्या दिवशी आशिर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदाच इथं गोवर्धनी मातेकडेच येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केलं. घरातील उर्जावान स्त्री जेव्हा लोकप्रतिनिधी होते त्यावेळेस आपल्या कुटुंबाप्रमाणेच आपल्या शहराची आपल्या मतदारसंघाची काळजी घेत असते, तेच आम्हाला मंदाताईंमध्ये पाहायला मिळतं, सातत्याने कुटुंबाप्रमाणे आपल्या लोकांची काळजी करत भूमीपूत्रांचे विषय असो, आगरी कोळी समाजाचे विषय असो, महिलांचे, लहान मुलं आबालवृद्ध अशा सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात. आता महापालिका निवडणुका होणार आहेत आणि तुमची विकासकामं लोकांनी पाहिलं आहे, त्यामुळे जनतेचा आशिर्वाद पुन्हा मिळेल आणि या नवी मुंबईची सेवा करण्याकरता या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा पाहिला मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai