Breaking News
मालमत्ता क्षेत्रात उत्साहाचं वातावरण
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जारी केलेल्या अर्थविषयक धोरणात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात न आल्यामुळे मालमत्ता क्षेत्रात उत्साहाचं वातावरण असून गृहकर्जावरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. गृहकर्जावरील व्याजदर कमी असल्यामुळे घर खरेदीसाठी सध्याचा काळ उत्तम मानला जात आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे घरांच्या मागणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाबाबत क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनी आनंद व्यक्त केला असून रेपो तसंच रिव्हर्स रेपो दरांमध्ये वाढ न करण्याचा निर्णय अत्यंत क्रांतीकारी आणि देशाला प्रगतीकडे नेणारा असून यातून रिझर्व्ह बँकेची उदारमतवादी वृत्ती दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यातही संपूर्ण उद्योगक्षेत्रावर ओमायक्रॉनचं सावट असताना रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा निर्णय मालमत्ता उद्योगाला नवी दिशा देणारा असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुढे सांगतात, गृह कर्जावरील व्याजाचे दर कमी राहिल्यामुळे मालमत्ता खरेदीदारांमध्ये विश्वास निर्माण होऊन देशाच्या अर्थव्यवस्थावाढीलाही वेग येईल. मालमत्ता क्षेत्रातले एक तज्ज्ञ निरंजन हिरानंदानी यांनीही रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं. गृहकर्जावरील कमी व्याजदरांचा लाभ घेण्यास नक्कीच उत्सुक असतील, असं ते सांगतात.
इंडिया सूथबी इंटरनॅशनल रिऍल्टीचे सीईओ अमित गोयल म्हणतात, गृहकर्जावरील व्याजदर सात टक्क्यांवर स्थिर असून यामुळे निवासी मालमत्तेच्या मागणीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. आता सगळ्यांच्या नजरा राष्ट्रीय अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत. अर्थसंकल्पात गृहकर्जावर अधिक कपात करण्याचा निर्णय झाल्यास भारतीय मालमत्ता उद्योगाला नवी दिशा मिळू शकते. नारेडको महाराष्ट्र’चे अध्यक्ष संदीप रनवाल यांच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या अखेरीपर्यंत गृहकर्जावरील व्याजदर अत्यल्प राहतील. यामुळे मालमत्ता उद्योग आणि अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. हाउसिंग डॉट कॉम, मकान डॉट कॉम तसंच प्रॉपटायगर डॉट कॉमचे समूह सीईओ ध्रुव अग्रवाल सांगतात, रेपो दरांमध्ये वाढ न करण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय अपेक्षित होता. गेल्या काही तिमाहींमध्ये घरांच्या विक्रीत वाढ नोंदवण्यात आली असून गृहकर्जावरचे कमी व्याजदर हेच यामागचं महत्त्वाचं कारण आहे. भारतीय अर्बनचे सीईओ अशविंदर सिंह यांनीही रेपो दरांमध्ये वाढ न करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं असून येत्या काळातही गृहकर्जावरील व्याजदर कमी राहतील, असं म्हटलं आहे. नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनीही मालमत्ता क्षेत्राने घेतलेल्या उभारीचं श्रेय गृहकर्जावरील कमी व्याजदरांना दिलं आहे. कमी व्याजदरांमुळे मागील सहा तिमाहींमध्ये मालमत्ता उद्योग मोठ्या प्रमाणावर सावरलं आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात मालमत्ता क्षेत्राला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai