विरोधकांना पराभूत करण्यासाठी एकजूट आवश्यक
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 30
महाविकास आघाडीला जयंत पाटलांचा एकजुटीचा मंत्र
रायगड ः मी खचणार नाही तुम्हीही खचू नका. माझा उत्साह टिकवून ठेवण्याची ताकद तुमच्यात आहे, तो आणखी वाढवण्याची ताकदही तुमच्यातच आहे. शेतकरी कामगार पक्ष संपला, असे म्हणणाऱ्यांना आपल्या एकजुटीने आणि संघर्षाच्या बळावर उत्तर द्यायचे आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून 2029 मध्ये नवा इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी प्रथम ही जुलमी आणि अहंकारी राजवट सत्तेवरून खाली खेचावी लागेल, असा घणाघात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी केला.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले, अनेक निवडणुका आपण लढलो, अनेक विक्रम केले. चढ-उतार प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येतात. मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर लढणारा पक्ष म्हणून शेकापची ओळख आजही कायम आहे. देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारा नेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडे देश आशेने पाहत आहे. विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत ते म्हणाले, देशात परिवर्तनाची ठिणगी नेहमी तरुणाईच पेटवत आली आहे. अलीकडील विद्यार्थी आंदोलनानेही तेच सिद्ध केले. त्या संघर्षात शेकाप खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिला. चित्रलेखा पाटील आणि ॲड. साम्या कोरडे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभाग नोंदवत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे 2029 ची लढाई ही परिवर्तनाची लढाई असेल. कार्यकर्त्यांनी निराश न होता नव्या जोमाने कामाला लागावे.
गावपातळीवरील संघटनात्मक बांधणीवर भर देताना त्यांनी सांगितले, ग्रामपंचायतींपासून प्रत्येक निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे. स्थानिक मतभेद बाजूला ठेवून विरोधकांना पराभूत करण्यासाठी एकजूट आवश्यक आहे. उरण तालुक्याने हे करून दाखवले आहे. त्याच धर्तीवर राज्यभर संघटन उभे राहिले पाहिजे.यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. गोरगरीबांच्या हिताचे राजकारण करणारा नेता म्हणून आम्ही अंतुले साहेबांकडे पाहात होतो.
- विमानतळाला दिबांचे नाव द्या
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत त्यांनी सरकारवर टीका केली. भूमीपुत्रांच्या भावनांचा आदर झाला नाही, तर तीव्र आंदोलन उभारावे लागेल. दुसऱ्या मुंबईच्या उभारणीत जशी फसवणूक झाली, तशी तिसऱ्या मुंबईत होऊ देणार नाही. पेण, पनवेल, उरण, अलिबाग आणि रोहा परिसरातील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी शेकाप मित्रपक्षांसह मोठा संघर्ष उभारेल, असा इशारा त्यांनी दिला. - स्मार्ट मीटरविरोधात गावोगावी रणशिंग फुंकणार
स्मार्ट मीटर योजनेविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत जयंत पाटील म्हणाले, गावोगावी बैठका घेऊन हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले जातील. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी होणारी सक्ती सहन केली जाणार नाही. महावितरण आणि संबंधित अदानी कंपन्यांच्या मनमानीविरोधात गावपातळीवर तीव्र संघर्ष उभारला जाईल. - नव्या पिढीने संघर्षाची दिशा दाखवली
विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, या नव्या पिढीने देशाला संघर्षाची दिशा दाखवली. बारा वर्षांत कोणासमोर न झुकणाऱ्या सत्तेलाही विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे माघार घ्यावी लागली. हीच युवाशक्ती परिवर्तन घडवू शकते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai